कोरोनातील उत्सव
कोरोनातील गणेशोत्सव आणि जबाबदारी
महाराष्ट्रातील विशेषत: मुंबईच्या गणेशोत्सवाची चर्चा जगभर होते.येथील गणेशोत्सवाचा उत्साह आणि गणेशभक्तांची स्फूर्ती एकंदरीत संपूर्ण वातावरण प्रफुल्लीत करणारी असते.प्लेगची साथ वगळता गणेशोत्सव काळात अनेक नैसर्गीक आपत्ती आल्या ,मात्र गणेशोत्सव नेहमीच थाटातमाटात साजरा झाला आहे.मात्र यंदा कारोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे.महाराष्ट्रासह देशभर सार्वजनिक गणेशोत्सवार कोरोनाचे अन भितीचे सावट पसरले आहे.त्यामुळे ऐरवी आढळून येणारा उत्साह व जागर यंदा मात्र विरळच असणार आहे. कोरोनाने जग वेढले असतांना लॉकडाऊनचे पालन करणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.सोशल डिस्टन्सींग,मास्क आणि गर्दी टाळणे याचे भान प्रत्येकच गणेशभक्ताला जपावे लागणार आहे.आज पासून सुरू होणा-या गणेशोत्सवाचे स्वरूप यंदा प्रथमच वेगळे राहणार आहे.
गणेशोत्सवाला ऐतिहासिक व स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी लाभलेली आहे. स्वातंत्रपुर्व काळात स्वातंत्र्य चळवळी सुरू झाल्या होत्या.त्यामुळे चळवळींना बंदी घालून लोकांनी एकत्र येण्यावर इंग्रजांनी निर्बंध लादले होते.त्यामुळे आचार-विचाराचे माध्यमच हिरावले गेले होते.परंतू स्वराज्याच्या मंत्राने भारावलेले लोकमान्य टिळक यांनी नागरिकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सवाची मुहर्तमेढ रोवली. लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र जमत आणि त्यातून प्रबोधन साधणे शक्य झाले. त्यातूनच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरूवात झाली. ती 1893 ला आणि अनंत चतुर्दशीला गणेश मुर्तीचे विसर्जन करायची प्रथा पडली.ब्रिटीश सरकार धार्मीक उत्सवाला विरोध करू शकत नव्हते त्यामुळे टिळकांचा उद्देश यातून सफल झाला. देश स्वतंत्र झाला तरी गणेशोत्सव आजही धुमधडाक्यात सुरू आहे. महाराष्ट्राचे लाकडे आराध्य दैवत म्हणून गणरायाला संबोधले जाते.
मात्र, यंदाचा उत्सव साजरा करताना संयम बाळगणे आणि नियम पाळणे गरजेचे आहे. यंदा बिनधास्तपणा आणि भावनिक जल्लोषाने कोवीड-19 संक्रमण झाल्यास फार मोठी किंमत मोजावी लागण्याची भिती आहे.त्यामुळे आपण आणि इतर कसे सुरक्षित राहील याची काळजी प्रत्येकाला करावी लागणार आहे. विसर्जनसमयी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी सर्वच घरगुती गणेशाचे विसर्जन आपल्या घरीच करावे,असे सरकार व प्रशासनातर्फे वारंवार आवाहन करण्यात येत आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार यंदाचा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करतानाही काही नियम पाळणे गरजेचे आहे. श्रीगणेश आगमन तसेच विसर्जन प्रसंगी कुठल्याही स्वरूपाची मिरवणूक काढता येणार नाही. मूर्ती चार फुटाच्या वर नसावी आणि सार्वजनिकरीत्या कुठलेही कार्यक्रम होणार नाही, याची काळजी मंडळांनी घ्यायची आहे. पेंडालवरही नियंत्रण असून यासाठी प्रशासनाचा कस लागणार आहे. प्रशासनाने ह्या सर्व नियमांचे पालन मंडळांकडून होते अथवा नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. घरगुती गणेशाचे विसर्जनही यंदा भाविकांनी घरीच करावे. मंडळांनी नियम पाळावे आणि गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन होत आहे. त्यामुळे याची खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.
कोरोनासंकटाला परताऊन लावण्यासाठी प्रत्येक नागरिकांनीच संयम बाळगला आहे. आता यापुढेही तो बाळगणे महत्वाचे आहे.सार्वजनिक गणेशोत्सवातील उपक्रमांना फाटा देत त्यातून कोरोना जनजागृतीचे प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.या वेळी गणोशोत्सवात निरूत्साह असला तरी पुढील वर्षी जल्लोष राहील अशी अनेकांना अपेक्षा आहे.
Ganpati bappa ki jay ho